मुंबई – उस्मानाबादमध्ये पुढील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये होणारे ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चांगलेच वादात सापडले आहे. नुकतीच या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्या निवडीला विरोध होताना दिसतोय. साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड केल्याबद्दल साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे वृत्त आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी बोलताना ठाले पाटील म्हणाले, “आम्हाला धमक्यांचे फोन येत आहेत ही खरी बाब आहे. फादर दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध करणारे मला स्वतःला २० ते २५ फो फोन येऊन गेले आहेत. तर आणखी काही अनोळखी मिस्ड कॉलही आले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त फोन हे ठाणे, कल्याण, मुंबई येथून आले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे,
फादर दिब्रिटो यांची निवड करण्याचा निर्णय हा एकमताने झाला आहे. दिब्रिटो यांच्या निवडीनंतर मराठीतील सर्व माध्यमांसह मान्यवरांनी याचे स्वागत केले आहे. विकास आमटेंनीही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिब्रिटो यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. माझ्यासह पुण्यातील साहित्य महामंडळाचे पदाधिकारी प्रा. मिलिंद जोशी यांनाही अशा प्रकारे धमक्यांचे फोन आले आहेत.
या फोनमधून अनेकांनी दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध दर्शवला मात्र, यांपैकी दोन जणांनी माझ्याशी चढ्या आवाजात बातचीत केली. यांपैकी सत्यजित देशमुख यांचा आवाज चढला होता. तर एका तरुणाने मला मेसेज पाठवत तुम्हाला पाहून घेऊ अशा स्वरुपाची धमकी दिली आहे, असेही ठाले पाटील यांनी सांगितले आहे.