सणबूर -ज्या गद्दारीची भाषा आपल्या तोंडी आता येत आहे. मात्र, ज्यावेळी आपल्या नेत्यांनी कॉंग्रेसमधून बंडाळी करत बाहेर पडून वेगळा पक्ष स्थापन केला. त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या आपल्या पिताश्रींनी नेमके काय केले होते? याचे उत्तर तुम्ही अगोदर जनतेला द्या. तसेच उठाव आणि बंडाळी यातला फरकच ज्यांना कळत नसेल, अशा निष्क्रिय आणि जनतेने दोनवेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रतिसवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काही मंडळी केवळ प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करत असून त्यांचे कार्यकर्ते टिकून रहावेत, यासाठी त्यांची करमणूक करण्याचा हा प्रकार आहे. मात्र, मतदारसंघातील सर्वसामान्य जनता याकडे गांभीर्याने बघणार नाही. महाविकास आघाडीच्या 5 वर्षाच्या काळात या निष्क्रिय नेतृत्वाने तालुक्यातील जनतेला माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांची खोटी पत्रके काढून निव्वळ करमणुकीचा खेळ केला. त्यामुळे आपण केलेल्या करमणुकीमुळे आपल्या सोबत किती जनता आहे? हे येणाऱ्या काळात कळेलच. केवळ मोठ्या नेत्यांची नावे घ्यायची आणि त्यांच्या नावे ई-पत्रक काढून लोकांची दिशाभूल करायची, हा प्रकार तालुक्यासाठी नवीन नाही. अशा प्रकारे केलेला प्रयत्न तालुक्यातील सुज्ञ जनतेने त्यावेळी हाणून पाडला आहे.
निवडणूक आली की वाड्याच्या बाहेर पडायचे आणि जनतेमध्ये दिशाभूल करायची, हा तुमचा कार्यक्रम आता जनतेला माहिती झाला आहे. जनता सुज्ञ आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील गावे व वाड्या-वस्त्यांच्या प्रलंबित विकास करण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असून गावागावामध्ये विविध विकास कामेही सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेने विकासकामे करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिले आहे. जनतेच्या आशीर्वादानेच आपला दोनदा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
समोरासमोर येण्याचे आपण जे आव्हान करत आहात; ते आम्ही यापूर्वीच केले आहे. आपणच ठिकाण तारीख व वेळ सांगा. समोरासमोर येऊन दूध का दूध व पाणी का पाणी केले जाईल, असे सदर पत्रकात म्हटले आहे. तसेच दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या व ग्रामपंचायतीच्या फंडातून पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांच्या भूमिपूजनासाठी जाण्याची आजपर्यंत वेळ आली नाही. मंजूर असलेल्या विकासकामांची भूमिपूजने ही भागातील, गावागावातील माझे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाची कामे सुरू आहेत की नाही? हे झोपेच्या सोंगत असलेल्या व काविळ झालेल्यांना दिसणारच नाहीत, असा टोलाही ना. देसाई यांनी सदर पत्रकाद्वारे सत्यजित पाटणकर यांचे नाव न घेता लगावला आहे.