पिंपरी – पराभव पहिल्यांदा रणात होत नाही तर मनात होत असतो, जी माणसे मनाने पराभूत होतात ती माणसे रणात जिंकू शकत नाही. रण जिंकायचे असेल तर पहिल्यांदा मन जिंकायला हवे, आणि मन जिंकायचे असेल तर त्याला संत मंडळींच्या अध्यात्माचा सर्वसमावेशक विचार जोपासायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनाची मशागत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या सानिध्यात झाली म्हणून तर ते सर्वश्रेष्ठ लोककल्याणकारी राजे होऊ शकले, असे मत शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भक्ती शक्ती समूहशिल्प, निगडी येथील उद्यानात झालेल्या शिवव्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, सचिन चिखले, नगरसदस्य प्रा. उत्तम केंदेळे, अमित गावडे, मारुती भापकर, रमेश भोसले, जीवन बोराडे, सागर तापकीर, प्रतीक इंगळे, अभिषेक म्हसे, विनायक जगताप, दादासाहेब पाटील, नीलेश शिंदे, प्रवीण पाटील, दत्ता शिंदे, ज्ञानेश्वर लोभे, सतेज परब, हनुमान डक, किरण जंजाळ, विनायक जाधव, अजय वर्पे, स्वप्नील शिंदे, भावेश काचा, जालिंदर खतकर, सतीश काळे, धनाजी येळकर, सचिन आल्हाट, राजू पवार, सचिन ढोबळे, नकुल भोईर आदी उपस्थित होते.
शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील म्हणाले, भक्तीने शक्तीला दिलेला आशीर्वाद म्हणजे छत्रपती शिवराय, शिवाजी महारांजांना जगतगुरू तुकाराम महाराजांनी दिलेली पहिली पदवी छत्रपती व्हा, म्हणून तर शिवाजी महाराजांना आपल्या नावापुढे कुठल्याही पदव्या न लावता जगतगुरू तुकाराम महाराजांनी दिलेली पदवी स्वीकारली. शक्तीला भक्तीचे अधिष्ठान प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसदस्य मारुती भापकर यांनी केले तर जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संतोष पाचपुते यांनी आभार मानले.