गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, खामगांव, रांजणे, कोंडागांव, आंबेड, ओसाडे गावात दिल्लीतील नागरिक आल्याची अफवा
वेल्हे – काही वृत्त वाहिन्या आणि व्हॉट्सऍपवर पुण्यातील रुग्णालयातून मरकजला गेलेले करोनाबाधीत 5 ते 6 रुग्ण सिंहगडच्या दिशेने पळाल्याची बातमी झळकली आणि वाऱ्यासारखी ग्रामीण भागात पसारली.
हे रुग्ण गावात येतात आणि माणसांच्या अंगावर थुंकतात त्यामुळे आपल्याला करोनाचा संसर्ग होणार आणि आपण मरणार, अशा अफवा गावागावांत पोहचल्या आणि याची धास्ती घेऊन गावे रात्रभर जागीच राहिली. पोलीसही या रुग्णांचा स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेऊ लागले. सायंकाळी शोध मोहीम चालू झाली ती रात्री उशिरा दीड-दोन वाजेपर्यंत चालली. मात्र ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अफवा पसरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
ही अफवा पसरताच गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, खामगांव, रांजणे, कोंडागांव, आंबेड, ओसाडे व हवेलीसह पानशेत परिसरातील गावे मरकजहून परतलेले नागरिक पुण्यातील रुग्णालयातून पळाले असून ते करोनाबाधीत आहेत, आणि ते कधीही आपल्या गावात येतील या भीतीने घाबरून रात्रभर झोपलीच नाहीत. कोरोनाबाधीत रुग्ण जंगलात लपवून बसले असल्याच्या अफवेने पोलिसांचीही धावपळ झाली. त्यांनीही या परिसरात कसून तपास चालू केला.
सायंकाळापासून पहाटेपर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. पोटात अन्न नाही की पाणी नाही, अशा भयानक अवस्थेत रात्रीच्या अंधारात टॉर्च, बॅटऱ्यांच्या मिणमिणत्या उजेडात पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी गावांभोवतालची जंगले व सिंहगडाच्या सर्व बाजू पिंजून काढल्या.
डोंगर दऱ्या तुडवल्या, मात्र कोणीच आढळले नाही. नंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी दम टाकत आपली शोधमोहीम थांबवली. मात्र, यानंतर अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.