पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे दिला जाणारा श्रीगुरुजी पुरस्कार यंदा तामिळनाडू आणि केरळ येथील संस्थांना जाहीर झाला आहे. समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, संस्थेचे कार्यवाह राजन गोऱ्हे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सेवाकार्यप्रमुख शैलेंद्र बोरकर, सचिव प्रदीप सबनीस यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मा. स. गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे २९ वे वर्ष आहे.
सेवा भारती दक्षिण तामिळनाडू आणि भारतीय विचार केंद्रम, केरळ अशी दोन संस्थांची नावे आहेत. दि. ३ मार्च रोजी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी साडेपाच वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, तर संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे.
सेवा भारती दक्षिण तामिळनाडू ही संस्था गेल्या ३४ वर्षांपासून ३१ जिल्ह्यांमध्ये सेवा क्षेत्रात काम करत आहे. तर, तिरुवअनंतपूरम येथे १९८२ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय विचार केंद्रम, केरळ संस्थेतर्फे प्रामुख्याने प्राचीन भारतीय सांस्कृतिक वारसा जतनाचे तसेच भारतीय जीवनमूल्ये आणि जीवनदर्शाचा प्रचार-प्रसार हे कार्य चालते.