पिंपरी – करोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांना जाणवणारी सौम्य लक्षणे व कमी प्रमाणात सापडणाऱ्या बाधितांमुळे बहुतांश निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे गेली दोन वर्षे न भरलेल्या गावजत्रांसाठी यंदाचा हंगाम पूरक ठरणार आहे. बैलगाडा शर्यत, लोकनाट्य तमाशा व पै-पाहुण्यांना घातल्या जाणाऱ्या जेवणावळी असे चित्र शहरी व ग्रामीण भागात दिसणार आहे.
पौष पौर्णिमेपासून जिल्ह्यातील गावजत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, सुरुवातीला करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे गेल्या महिन्यात आकुर्डी येथील श्री खंडोबा देवस्थानची यात्रा करोनाचे निर्बंध पाळून साजरी करण्यात आली. त्यामुळे यंदादेखील गावजत्रांवर करोनाचा प्रादुर्भाव जाणवणार असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
गावजत्रा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो खास ग्रामीण ढंगातील अनोखा बाज. मांडव डहाळे, ग्रामदैवतेची मिरवणूक, गावात आलेले उंच झोके, खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विक्रीच्या दुकानांमध्ये ग्राहकांची झालेली गर्दी, मनोरंजनाचे कार्यक्रम, पै-पाहुण्यांच्या पडणाऱ्या जेवणावळी आणि सर्वात महत्वाची म्हणजे बैलगाडा शर्यत. अशा अनेक बाबींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. मात्र, गेली दोन वर्षे हे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत नव्हते. त्यामुळे सर्वच गावांमध्ये मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत साधेपणाने ग्रामदेवतेची पूजा करुन हा उत्सव साजरा करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड हे शहर असले, तरीदेखील महापालिकेत समाविष्ट असलेली अनेक गावे आपली स्वतंत्र ओळख आजही टिकवून आहेत. समाविष्ट गावांमध्ये आजही ग्रामीण ढंगात ग्रामदैवतेचा उत्सव साजरा केला जातो. करोनाचे निर्बंध शिथील केल्याने गावजत्रा साजऱ्या करताना मावळ तालुक्यात नाणोली येथे तर आंबेगाव तालुक्यात लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. चिखली, भोसरी व चऱ्होली येथेही आजही बैलगाडा घाट या शर्यतींच्या प्रतीक्षेत आहेत. भोसरी व चऱ्होली ग्रामदेवतेचा उत्सव काही दिवसांतच साजरा होणार आहे. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातही गावजत्रांना उत्साहात सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना
दोन दिवसांच्या ग्रामदैवताच्या उत्सव कालावधीत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना गावजत्रेतून आर्थिक कमाईची अपेक्षा असते. त्यामुळे ग्रामदैवतांच्या यात्रांमुळे अनेक व्यावसायिक गावामध्ये वस्तू विक्रीकरिता येत असतात. वर्षभरातून एकदाच साजरा केला जाणाऱ्या उत्सवात पै- पाहूणे व नागरिकांकडून होणाऱ्या खरेदीमुळे, मनोरंजनाच्या कार्यक्रमांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. जत्रेमुळे कार्यक्रमांची रेलचेल असते.
करोनाच्या कालावधीत नागरिकांना अनेक निर्बंधांमध्ये रहावे लागले आहे. सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे घराबाहेर पडणेदेखील मुश्किल होते. गेली दोन वर्षे ही परिस्थिती होती. आता करोनाची तिसरी लाट कमी तीव्रतेची असल्याने गावजत्रा भरविण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा ग्रामीण भागात अस्सल ग्रामीण ढंगात या गावजत्रा भरविल्या जात आहेत.
– अंकुश तापकीर, चऱ्होली.