पिंपरी – भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद कमी असलेल्या कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेससह काही महत्वाच्या रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. करोना महामारीमुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे शहरातील चाकरमान्यांचे हाल होऊ लागले आहेत. बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी चाकरमान्यांनी केली आहे.
रेल्वेच्या नवीन धोरणानुसार फक्त हंगामामध्ये फुल्ल आणि इतर वेळी तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर रद्द केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने याबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी करोनाच्या साथीमुळे मार्च 2020 पासून बंद केलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे ही बंद केलेली सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी होऊ लागली आहे.
याबाबत प्रवाशी संघाचे अध्यक्ष इकबाल मुलानी म्हणाले, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे काही मार्गावरील रेल्वे बंद केल्या आहेत. मात्र, हे चुकीचे असून प्रवाशांचा विचार करून बंद केलेल्या रेल्वे पुन्हा सुरू कराव्यात.