नवी दिल्ली : जगाच्या इतिहासातील अनेक युद्धे आणि लढाया तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. भारतीय इतिहासात अनेक युद्धेही झाली आहेत, ज्यांच्याबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. यातील बहुतेक युद्धे इतर राज्यांच्या ताब्यात घेण्यावरून झाली आहेत. पण भारतात 1644 मध्ये फक्त एका टरबूजासाठी युद्ध झाले. सुमारे 376 वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धात हजारो सैनिक मरण पावले. जाणून घेऊया या अनोख्या युद्धाबद्दल…
हे जगातील पहिले युद्ध आहे जे केवळ एका फळासाठी लढले गेले. या युद्धाची इतिहासात ‘मटिरे की राड’ म्हणून नोंद आहे. राजस्थानच्या अनेक भागात टरबूज ‘मटिरा’ म्हणून ओळखले जाते आणि राड म्हणजे लढा. हे अनोखे युद्ध 376 वर्षांपूर्वी 1644 मध्ये झाले होते. दोन संस्थानांतील लोकांमध्ये टरबूजासाठी लढाई झाली.
वास्तविक त्या काळात बिकानेर संस्थानातील सिल्वा गाव आणि नागौर संस्थानातील जाखाणिया गावाची सीमा एकमेकांना लागून होती. ही दोन गावे या संस्थानांची शेवटची सीमा होती. बिकानेर संस्थानाच्या हद्दीत टरबूजाची वेल लावण्यात आली होती. नागौर संस्थानाच्या हद्दीत याचे एक फळ लागले आणि हे फळच युद्धाचे कारण बनला.
* संस्थानांत रक्तरंजित युद्ध सुरू झाले
सिल्वा गावातील रहिवासी म्हणू लागले की, वेल आमच्याकडे लावली तर फळावर आमचाच हक्क आहे, तर नागौर संस्थानातील लोक म्हणू लागले की, त्यांच्या हद्दीत फळ लागल्यामुळे ते त्यांचेच आहे. या फळावरील हक्कावरून दोन्ही संस्थानांत सुरू झालेल्या भांडणाला अखेर रक्तरंजित युद्धाचे स्वरूप आले.
* राजांना युद्धाची माहिती नव्हती !
सिंघवी सुखमल यांनी नागौरच्या सैन्याचे नेतृत्व केले, तर रामचंद्र मुखिया यांनी बिकानेरच्या सैन्याचे नेतृत्व केले, असे म्हटले जाते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे दोन्ही संस्थानांच्या राजांना या युद्धाची माहिती नव्हती. जेव्हा ही लढाई सुरू झाली होती, तेव्हा बिकानेरचा शासक राजा करण सिंह मोहिमेवर होता, तर नागौरचा शासक राव अमरसिंग मुघल साम्राज्याच्या सेवेत तैनात होता.
या दोन्ही राजांनी मुघल साम्राज्याचे अधिपत्य मान्य केले. दोन्ही राजांना जेव्हा या लढाईची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मुघल राजाला यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. पण हे प्रकरण मुघल शासकांपर्यंत पोहोचेपर्यंत युद्धाला तोंड फुटले होते. या युद्धात बिकानेर संस्थानाचा विजय झाला, परंतु दोन्ही बाजूंनी हजारो सैनिक मारले गेल्याचे सांगितले जाते.