नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आज या आंदोलनाचा १३ वा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे.
या मुद्यावरून विरोधी पक्ष काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात असताना, आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील कृषी कायद्यांचा हा विषाणू शेतकऱ्यांना संपवेल असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
तत्पूर्वी ही त्यांनी “चलो दिल्ली…केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करणार.” असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विट केले आहे.
संसदेत कायदे मंजूर केल्यापासून शेतकरी राज्यांमध्येच आंदोलन करत होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली’ची हाक दिली होती.