अहमदाबाद – मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. मात्र, एका राज्याने या ‘भारत बंद’ ला पाठिंबा दर्शविला नाही. ते राज्य म्हणजे गुजरात.
या आंदोलनाला नाव केवळ शेतकऱ्यांचं आहे. मात्र विरोधक शेतकऱ्यांच्या नावावर ‘भारत बंद’ आंदोलन करत आहेत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या कॉंग्रेससहीत इतर राजकीय पक्षांना रुपाणी यांनी चांगलेच फैलाव घेतले. सध्या विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचेही रुपाणी म्हणाले.
अगोदर शेतकरी आंदोलनात कोणत्याही राजकीय पक्षांना सामावून घेतले जाणार नाही, असं शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र सध्या या आंदोलनात विरोधी पक्ष सहभागी झाल्याचे दिसत आहेत. आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही राजकीय पक्ष या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा वापर करत आहेत.
याच बरोबर जे लोक गुजरातमध्ये जबरदस्ती बंद पुकारण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री रुपाणी यांनी म्हटले.