नवी दिल्ली – देशातील सर्वाधिक बेरोजगारीचा दर (unemployment rate) आज तेलंगणात आहे, देशाचा बेरोजगाराचा एकूण दर 10 टक्के इतका असताना तेलंगणात (Telangana News) तो पंधरा टक्के इतका आहे. हे राज्य स्थापन होऊन दहा वर्ष झाली. या दहा वर्षात बीआरएसचे सरकार येथे आहे, पण त्यांना रोजगार निर्मिती करण्यात मात्र अपयश आले आहे असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jayram ramesh) यांनी म्हटले आहे.
खम्माम येथे पत्रकारांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, तेलंगणा निर्माण करण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे होते; पण येथे रोजगार निर्मीतीकडे लक्षच देण्यात आले नाही. तेलंगणात तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाणही जास्त आहे, असा दावा त्यांनी केला. राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याबद्दल त्यांनी बीआरएस सरकारवर टीका केली. (Congress leader)
तेलंगणाच्या (Telangan Widhansabha Election) निर्मितीमुळे खम्माम, करीमनगर सारखी शहरे आणि जिल्हे विकास आणि गुंतवणूकीचे साक्षीदार होतील, असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही. राज्याचा सर्वच विकास केवळ हैदराबादवर केंद्रीत झाला आहे असे ते म्हणाले. 10 वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती तीच आजही असल्याचा दावा त्यांनी केला.
जयराम म्हणाले की, कॉंग्रेसने तेलंगणा राज्याची स्थापना केली जेणेकरून केवळ हैदराबाद आणि त्याच्या शेजारील जिल्ह्यांचाच नव्हे तर सर्व जिल्ह्यांचा विकास होईल, अशी अपेक्षा होती असे ते म्हणाले. कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या दोन नेत्यांनाच तेलंगणाच्या निर्मितीचे श्रेय आहे असे त्यांनी म्हटले आहे. रमेश यांनी राज्यातील मुख्यमंत्री केसीआर यांच्या कौटुंबिक राजवटीवरही हल्लाबोल केला.