पुण्यातील पर्यावरणप्रेमींची शासनाला साद
पुणे – गंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य…मुंबईत फ्लोमिंगोचा थव्याचे विलोभनीय दृश्य…अशा एकामागोमाग एक सकारात्त्मक बातम्या सध्या वाचनात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एरव्ही गटारगंगा म्हणून हिणावली जाणारी पुण्यातील मुळा-मुठेची स्थिती काय आहे? याचे कुतुहल नदी अभ्यासकांमध्ये आहे. त्यामुळेच सरकारने या संधीचा फायदा घेत, पुण्यातील नद्यांचा अभ्यास करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. यासाठी शासनाला पत्र लिहण्याची मोहीमदेखील सुरू करण्यात आली आहे.
यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांना पत्र लिहून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत विनंतीदेखील केली जात आहे. याबाबत जीवितनदी संस्थेच्या संचालिका शैलजा देशपांडे म्हणाल्या, “पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमी, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधन संस्था करोनाच्या महासंकटमधून जात आहेत. मात्र, आरोग्य आणि आर्थिक स्तरावरील संकटांना तोंड देत असताना, पर्यावरणाच्या बाबतीत अनेक चमत्कार घडत आहेत.
सर्वच उद्योग ठप्प आहेत. तसेच अशी शेतीकामे सुरू आहेत. घनकचराही अत्यंत कमी आहे. त्यामुळे पाण्याचे शास्त्रीय आणि योग्य मूल्यमापन करण्याची ही सुवर्णसंधी आहे. भविष्यकाळात नदी मधले प्रदूषण कमी करण्यासाठी नेमकी कशी आणि कुठली पावले उचलावी लागतील, याचे अचूक निदान करून त्याप्रमाणे संयुक्त कृती आराखडा तयार करण्यासाठी यामुळे मदत मिळणार आहे. म्हणूनच शासनाने नद्यांचे नमुने तपासणी करावे, अशी विनंती संस्थेतर्फे पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे विविध कार्यकर्ते वैयक्तिकरित्या पत्र लिहून ही विनंती करणार आहेत.’