भंडारा – भाजपाची तानाशाही, नरेंद्र मोदीच्या रूपानं या देशात कशी चाललेली आहे, हे सगळ्या जनतेला कळलेलं आहे. त्याच्यामुळे भाजपची मिमिक्री होईल अशी परिस्थिती आज देशात निर्माण झाली आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. संसदेत उपराष्ट्रपतींची मिमिक्री केल्याच्या निषेधार्थ भाजपाने आज राज्यभर आंदोलन केले. त्यावर नाना पटोले बोलत होते.
लोकशाहीच्या मार्गाने खासदार आपल्या जागेवर उभे राहून जनतेचे प्रश्न उपस्थित करीत असताना तुम्ही त्यांना निलंबित करता? असा प्रश्न विचारत नाना पटोले यांनी भाजपवर अनेक मुद्यावरुन टिकास्त्र सोडले आहे.
भाजपचे पाप लपविण्यासाठी एखादा पिल्लू काढायचा, त्याचा इशू करायचा, हे नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हेच सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आणायला भाजप निघाली आहे. लोकशाहीचा गळा घोटायला ते निघाले आहे. तुम्ही तर आता साऱ्या दुनियेची मिमिक्री करत आहात.
नरेंद्र मोदी काय करतायेत? अमित शहा काय करतायेत? भाजपचे नेते काय करतायेत? देशात हिंदू-मुसलमानांमध्ये वाद निर्माण करणे, महाराष्ट्रात मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करणे, या पद्धतीने जी तणाव परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे, त्याचे उत्तर पहिले दिले पाहिजे. या पद्धतीचे पाप लपविण्यासाठी, प्रकरण दाबण्यासाठी भाजप निघाली असेल, तरी भाजपाचं हे कुणी ऐकायला तयार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.