मुंबई : शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले असून चिन्हही दिले आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले असून, ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावासाठी मान्यता देण्यात आली आहे. यानंतर आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आयोगाने उद्धव ठाकरेंच्या गटाला दिलेल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर रवी राणा यांनी,“ही ‘उद्धव बाळासाहेब सेना’ नव्हे तर ‘उद्धव काँग्रेस सेना’ आहे”, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदेंचींच ‘खरी शिवसेना’ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना, “उद्धव ठाकरे यांची सेना ही काँग्रेसच्या विचाराची सेना आहे. काँग्रेसच्या विचारांची सेना असल्याने त्यात पहिलं नाव उद्धव ठाकरेंचं आहे. एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाने न्याय दिला असून, त्यांचीच खरी शिवसेना आहे,” असे त्यांनी सांगितले.
तसेच “बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा एकनाथ शिंदेंकडे आहे. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिका व पोटनिवडणुकीत एकनाथ शिंदे व भाजपाची एकहाती सत्ता येईल”, असा विश्वास यावेळी रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.