मुंबई – हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सहावीत शिकणाऱ्या मुलाने मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र लिहले आहे. काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे अशी भावनिक साद या चिमुरड्याने मुख्यमंत्र्यांना घातली आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्यावे, असे भावनिक पत्र शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
या चिमुकल्याच्या पत्राची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर प्रशासन चिमुकल्या प्रतापच्या घरी पोहोचली. तसेच त्याच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. त्यांना घरकूलही दिलं जाणार आहे.
तत्पूर्वी, गोरेगाव येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा प्रताप जगन कावरखे याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. सहावीमध्ये शिकणा-या प्रतापने यावर्षी पावसामध्ये सोयाबीन गेल्याने दसऱ्याला पुरणाच्या पोळ्या खायला मिळाल्या नाहीत, अशी खंत व्यक्त केली. जुलै महिन्यात पावसाचा जोर कायम होता. ढगफुटी व सततच्या पावसामुळे सर्वत्र शेतजमिनी खरडून गेली. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.
बिकट परिस्थितीत शासनाच्या मदतीची अपेक्षा असताना सेनगाव तालुक्यातील चार मंडळे अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने शेतकरी चिंतीत झाला. सणाला पोळ्या तर सोडा पैसेही नाहीत. तसेच जवळील जयपूर गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने पैसे मागितल्यामुळे वडीलांनी फाशी घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सुखी ठेवावे आणि अनुदान लवकर द्यावे, अशी मागणीही या पत्रातून चिमूकल्याने केली होती.
हिंगोली जिल्ह्यातील जुन-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे अनेक जमिनी खरडुण गेल्या तर काही जमिनीतील पिके पाण्यात गेली प्रशासनाच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झालेल्या देण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. प्रशासनाकडे निधी देखील आला आहे, मात्र दसरा संपला आता दिवाळी आली तरी हा निधी वाटप करण्यात आला नाही. आता दिवाळीच्या आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.