सहकारनगर, दि. 14 (प्रतिनिधी) -बेंगळुरू शहर मागील चार-पाच दिवसांपासून पाण्याखाली आहे. पुण्यात रविवारी (दि.11) मुसळधार कोसळल्यानंतर सलग तीन दिवस पाऊस कायम आहे. यामुळे शहर, उपनगरातील प्रमुख रस्ते, चौक पाण्याखाली गेलेले आहेत. शहरातील सध्याची तकलादू आपत्कालीन यंत्रणा पाहता पाऊस वाढत गेल्यास अतिवृष्टीसारखी आपत्ती ओढावू शकते.
शहरात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ओढे, नाले रिकामे करणे गरजेचे आहे. ओढे, नाल्यांवरील अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे, अन्यथा पुण्याची अवस्था बेंगळुरू सारखी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे उपनगर अध्यक्ष जयराज लांडगे यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन महापालिका प्रशासक तसेच राज्य सरकारकडे देण्यात आले आहे.
पुण्यातून पाणी वाहून जाण्यासाठी जे नैसर्गिक ओढे, नाले आहेत. त्यातील ओढे, नाले अनेक ठिकाणी वळविण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी ते बंदिस्त करून वरील जागा वापरली जात आहे. अनेक ठिकाणी या पद्धतीने अतिक्रमणे करण्यात आली आहेत. यातून ओढे, नाले बुजले गेले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने आज शहर, उपनगरांत सर्वत्र पाणी साचले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील चौकात गुडघ्या इतके पाणी साचते, याचा अर्थ शहर नियोजन चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर शहर पाण्याखाली जाऊ शकते. ही बाब लक्षात घेत महापालिका प्रशासाने याकामी स्वतंत्र आराखडा तयारू करून ही समस्या सोडविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे ठरत आहे.
यासाठी “मनसे’ने पुढाकार घेतला असून नियोजनानुसार शहर, उपनगरांतून माहिती घेत उपाययोजना संदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन देण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाचे डोळे उघडण्याची गरज आहे, यासाठी संबंधित यंत्रणेशी चर्चा करणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.