भुवनेश्वर – कोविड महामारीमुळे सर्वच ठिकाणी दोन वर्ष शाळा बंद होत्या. पण दोन वर्षांच्या कालावधीनंतर वर्गात शिकवणे पुन्हा सुरू झाल्यानंतरही सुमारे 30 टक्के विद्यार्थी शाळेत परतलेच नसल्याचा प्रकार ओडिशा राज्यात घडला आहे. आता या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांना पुन्हा शाळेत दाखल करण्याची जबाबदारी ओडिशा सरकारने जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आढावा घेतल्यानंतर ही बाब लक्षात आली आहे. त्यामुळे राज्याच्या जनशिक्षण विभागाच्या सचिवांनी या 30 टक्के विद्यार्थ्यांना हुडकून काढून त्यांना पुन्हा शाळेत हजर करण्याची सूचना सर्वच जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
तपशीलवार विश्लेषण केल्यावर असे दिसून आले की मलकानागिरी, बौध, गजपती, संबलपूर आणि नुआपाडा या जिल्ह्यांमध्ये इयत्ता 1 ते 5 मधील उपस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी होती. माध्यमिक विभागात, गजपती, बोलंगीर, बारगढ, सोनेपूर, नुआपाडा, कटक, खोरधा, कोरापुट, गंजाम, बौध, मलकानगिरी, केओंजार, संबलपूर येथील शाळांमधील उपस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे, असे जनशिक्षण विभागाचे सचिव सेठी म्हणाले. गजपती, सोनपूर, बारागड, कंधमाल आणि नुआपाडा येथे उच्च माध्यमिक वर्गातील एकूण उपस्थिती अत्यंत कमी आहे, ही चिंतेची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले.
शालेय आणि जनशिक्षण विभागाने केलेल्या आढाव्यात असेही आढळून आले आहे की इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी 9वी मध्ये प्रवेश घेत नाहीत.