उधमसिंग नगर, (उत्तराखंड) – कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी उत्तराखंड मधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. मोदींच्या सरकारने कोविड महामारीच्या काळात शेतकऱ्यांना एक वर्ष रस्त्यावर राहणे भाग पाडले असा आरोप केला.
असला अघोरी प्रकार कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या बाबतीत कधीही केला नसता असेही त्यांनी म्हटले आहे.उत्तराखंड मधील भाजपची राजवट पुर्ण फसलेली राजवट होती असा आरोपही त्यांनी केला.
उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किच्छा येथे एका आभासी रॅलीला संबोधित करताना, राहुल गांधी यांनी सांगितले की, सध्या भारताला पंतप्रधान नाही तर मोदींच्या रूपाने एक राजा लाभला आहे जो निर्णय घेतो तेव्हा जनतेने शांत राहावे अशी त्यांची अपेक्षा असते.
ते म्हणाले की कॉंग्रेस शेतकरी, युवक, मजूर किंवा गरीब यांच्यासाठी कधीही आपले दरवाजे बंद करणार नाही, या घटकांबरोबर सरकारची भागीदारी करण्याची आमची इच्छा आहे. आणि त्यांच्या कल्याणासाठीच आमचे उत्तराखंड मधील नवीन सरकार कार्यरत राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली.