मायणी -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन करत सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आदेश दिले. मात्र मायणीत ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंग न पाळता नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नियमांचे उल्लंघन होत आहे. राज्यात लॉकडाऊनचा सध्या तिसरा टप्पा सुरू आहे. मात्र जनता दक्षता न बाळगता घराबाहेर पडत आहे, दुकाने व व्यवसाय सुरू आहेत, चांदणी चौकापासून ते गावातील मुख्य बाजारपेठेपर्यंत लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे. तर ग्रामपंचायतीने भाजी विक्रेत्यांना येथील खंडोबा माळावर बसण्यासाठी परवानगी दिली असली तरी तेथे मात्र जत्रेचे स्वरूप आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर सामाजिक अंतर पाळले जात नाही. मायणी मुख्य बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे, मायणी ग्रामपंचायतीने व पोलिसांनी आता खऱ्या अर्थाने ठोस निर्णय घेऊन अधिक कडक कारवाई करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या सकाळी नऊ ते दोन या वेळेपर्यंत प्रामुख्याने दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे.
सध्या खटाव व माण तालुक्यात खरशिंगे व विरळी या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मायणीत प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, महसूल विभाग यांनी सुस्कारा सोडला असला तरी खरेदीच्या निमित्ताने लोक घराबाहेर पडून प्रामुख्याने चांदणी चौक, मुख्य बाजारपेठ, खंडोबा माळ येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.