मुंबई, – परागंदा असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर संह यांचा पाय अधिकच खोलात गेल्याचे स्पष्ट झाले आहे कारण मुंबईतील कोर्टाने आज त्यांच्यावर तिसरे अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
त्यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणी वसुलीच्या गुन्ह्याच्या संबंधात सीआयडीने केलेल्या विनंतीनुसार कोर्टाने त्यांच्या विरोधात हे वॉरंट जारी केले आहे. परमवीरसिंह यांच्या खेरीज आठ अन्य तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातही हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधातील पहिली दोन वॉरंट कोरेगाव प्रकरण आणि ठाण्यात त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या संबंधातील आहेत.
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी वसुलीच्या प्रकरणात पोलिसांनी आज पहिली अटक केली असून पोलीस निरीक्षक अशोक कोरके आणि नंदकुमार गोपाळे यांना अटक करण्यात आली आहे.
आम्ही हे सारे परमवीरसिंह यांच्या सांगण्यावरूनच केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दोघांनाही 16 नोव्हेंबर पर्यंत सीआयडी कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.