नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आला तर या राज्यातील आशा वर्कर्सना आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रूपयांचे मानधन दिले जाईल या घोषणेचा पुनरूच्चार कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
शहाजहानपूर येथील पोलिसांकडून आशा वर्कर्सवर जो अत्याचार करण्यात आला त्याचा एक व्हिडीओ प्रियाकांनी ट्विटरवर शेअर केला आहे; यात मुख्यमंत्री योगींच्या भेटीसाठी आग्रही असलेल्या महिला कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी हल्ला करून त्यांना तेथून कसे पिटाळून लावले याची दृष्ये आहेत.
आशा कर्मचाऱ्यांवरील हा हल्ला म्हणजे त्यांनी आजवर केलेल्या कार्यावरील हल्ला आहे असे त्यांनी म्हटले आहे. मानधनात वाढ मागणे हा त्यांचा अधिकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांना त्यांचा पूर्ण सन्मान आणि त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.