दुबई -एन. श्रीनिवासन यांच्यामुळे मला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती मिळाली. गेल्या पाच-सहा वर्षांत अनेक मालिका जिंकलो. स्पर्धा जिंकल्या. परदेशातील अपयश दूर केले मात्र, आयसीसीची एकही स्पर्धा जिंकू शकलो नाही याची रुखरुख मात्र, कायम राहील, अशा शब्दात भारतीय संघाचे मावळते मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शास्त्री यांची मुदत संपल्यावर त्यांनी ड्रेसिंग रुममध्ये सगळ्या खेळाडूंशी संवाद साधला. आलेल्या अपयशावर चर्चा केली तसेच आगामी काळात कशा योजना असाव्यात यावरही संवाद साधला. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज व इंग्लंड या संघांना त्यांच्याच देशात पराभूत करण्याची किमया केली. भारतीय संघाने जागतिक स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले. मात्र, आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही हे मात्र, कायम सलत राहील. पण नव्या कर्णधारासह तसेच नव्या प्रशिक्षकासह ही कसरही भरून काढू, असेही शास्त्री म्हणाले.
भारतीय संघाचेआव्हान आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत संपले. अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने नामिबियाचा पराभव केला. या सामन्यानंतर कोहलीच्या भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्वाची अखेर झाली.तर मुख्य प्रशिक्षकपदी असलेल्या शास्त्री यांचीही मुदत या स्पर्धेनंतर संपली.
भारतीय संघाला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील अपयशाबद्दल कोणतीही सारवासारव करणार नाही. आम्ही पराभूत झालो ही वस्तुस्थिती आहे पण येत्या काळात अशा मोठ्या स्पर्धेपूर्वी खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी. आयपीएल स्पर्धा संपल्यावर दोनच दिवसांत विश्वकरंडक स्पर्धा सुरु झाली. आता येत्या काळात जागतिक स्पर्धांचा विचार करुन वेळापत्रक तयार केले जावे, असा विश्वासही शास्त्री यांनी व्यक्त केला.