थोर समाजसेविका डॉ. कमलाबाई देशपांडे यांची 22 फेब्रुवारी रोजी 125 वी जयंती नुकतीच झाली. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला सामाजिक सुधारणांचा वारसा लाभला असून, टिळक, आगरकर, महर्षी कर्वे, पंडिता रमाबाई यांसारख्या अनेक प्रतिभावंत व्यक्तींच्या विचारांचा मोठा प्रभाव अनेकांवर पडला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेच्या आजीव सदस्य व भारतीय समाजसेविका म्हणून डॉ. कमलाबाई देशपांडे प्रसिद्ध आहेत.
कमलाबाई यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1898 रोजी पुणे येथे झाला. त्या साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्या कन्या होत. त्यांचा विवाह साताऱ्याचे गोपाळराव कुशाभाऊ देशपांडे यांच्याशी 28 मे 1910 रोजी झाला. पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली, पण दुर्दैवाने एका वर्षानंतर गोपाळरावांचा आकस्मिक मृत्यू झाला. कमलाबाई विधवा झाल्या. त्या काळात विधवांची स्थिती अतिशय वाईट होती.
केशवपनाची रूढी प्रचलित होती. पण कमलाबाई या रूढींपुढे नमल्या नाहीत. सकेशा विधवा म्हणून वावरताना त्यांना खूप मनस्ताप व अवहेलना सहन करावी लागली. त्यांचे सासरे कुशाभाऊ देशपांडे हे विचाराने पुरोगामी व सुधारणावादी असल्याने त्यांनी कमलाबाई यांना आपली मुलगी मानून शिक्षण द्यायचे ठरवले. सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला व सन 1917 मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सन 1920 मध्ये पुण्याच्या हिंगणे विद्यापीठातून त्यांनी गृहितागमा (जी.ए.) पदवी मिळविली. आपल्या पुढील शिक्षणाचा विचार बाजूला सारून कमलाबाईंनी ही जबाबदारी स्वीकारली, पण महर्षी कर्वे यांच्या आग्रहाखातर त्या पुणे विद्यापीठातून एम.ए. झाल्या.
16 मार्च 1929 रोजी त्यांनी परदेशी प्रयाण केले. सन 1931 मध्ये त्यांचा “द चिल्ड्रन ऑफ एन्शन्ट इंडिया’ या विषयावरील प्रबंध पूर्ण झाला. त्यांना झेकोस्लोव्हाकियाच्या प्राग विद्यापीठाची पीएच.डी. पदवी मिळाली. प्रबंधासाठी त्यांनी जर्मन भाषेचा अभ्यास केला. परदेशातील वास्तव्यात त्यांनी आपला पेहराव, आहार, राहणी, विचार, संस्कृती यात कोणताही बदल केला नाही. स्त्रीने शिकून आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे या विचारातून महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ महिलाश्रमाचे काम सुरू केले असल्याने महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कन्याशाळा सुरू केल्या तरच स्त्रीशिक्षणाचा प्रसार होईल या महर्षी कर्वे यांच्या आवाहनाला साताऱ्यातील डॉ. पंढरीनाथ घाणेकर, डॉ. मो. ना. आगाशे, कमलाबाईंचे दीर वाग्भट देशपांडे यांनी प्रतिसाद दिला.
20 ऑक्टोबर 1922 रोजी वाग्भट देशपांडे यांच्या घराच्या ओसरीवर साताऱ्यात कन्याशाळेचा प्रारंभ झाला. कमलाबाईंनी सन 1922 ते 1942 या काळात शाळेच्या प्रमुखाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. सातारच्या कन्याशाळेच्या संचालक मंडळाशी झालेल्या मतभेदामुळे त्यांनी शाळेच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला. कमलाबाईंचे व्यक्तिमत्त्व कर्तव्यकठोर असून, सर्वांविषयी आपलेपणा, ध्येयवाद, कार्यनिष्ठा, तेजस्वी बुद्धिमत्ता, शिस्तप्रियता हे विशेष गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेले होते.
स्वतःच्या उत्पन्नाचा 20 टक्के भाग त्या सामाजिक कार्यासाठी देत. त्यांनी अखेरपर्यंत स्वतः विनावेतन काम केले. शाळा सारवणे, भिंती रंगवणे, घरोघरी जाऊन पैसे जमा करणे, शाळेसाठी मुली जमविणे ही सर्व कामे कमलाबाई करीत. काही वर्षे पुण्याच्या महिला पाठशाळेत संस्कृतच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केले, तसेच पुणे येथील हुजूरपागेच्या मुलींच्या महाविद्यालयात प्राचार्या म्हणून व नंतर पुणे विद्यापीठात एम.ए.च्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक म्हणून कमलाबाईंनी काम केले.
साहित्यसम्राट न. चि. केळकर यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न पित्याचे त्यांना मार्गदर्शन लाभल्याने त्यांनी कथा, कविता, शब्दचित्रे अशा साहित्यातील विविध प्रांतात आपल्या लीलया लेखणीने मुशाफिरी केली. त्यांनी सतीबंदीच्या कायद्यापासून ते हिंदू कोड बिलापर्यंत स्त्रियांसाठी असणाऱ्या कायद्यांचा अभ्यास करून “स्त्रियांच्या कायद्याची वाटचाल'(1960) या सारखे अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले. या पुस्तकाला सन 1961 मध्ये न. चिं. केळकर वाङ्मय पुरस्कार मिळाला.
सन 1943 मध्ये त्यांनी “स्मरणसाखळी’ या नावाने आपले आत्मचरित्र लिहून, त्या काळातील विधवा स्त्रियांच्या स्थितीचे प्रातिनिधिक चित्रण अगदी उत्तमरीत्या साकारले आहे. स्त्रीगीतांचे संशोधन करून त्यांनी “अपौरुषेय वाङ्मय अर्थात स्त्रीगीते’ हे पुस्तक लिहिले. तसेच चिमण्या (1942), हसरा निर्माल्य आणि चिमण्या (1945) ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके. महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, महाराष्ट्रातील संतस्त्रिया याविषयी त्यांनी विपुल लेखन केले असून, अनेक विषयांवर माहितीपूर्ण व्याख्याने दिली. पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल व्याख्यानमालेतही त्यांचा सहभाग असे.
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या कमलाबाईंनी “भारत सेविका समाजा’ची स्थापना करून विधवांना मदत करण्याचे कार्य हाती घेतले. कमलाबाईंनी लहान वयात केलेल्या कविता त्यांचे बंधू यशवंत नरसिंह केळकर यांनी गीत द्विदल भाग- 1 (1925) या संग्रहात संपादित केल्या आहेत. 8 जुलै 1965 रोजी भारत सेविका समाजाचा 67 वर्षे अखंड तेवणारा नंदादीप अकस्मात विजल्याने पुरोगामी महाराष्ट्रावर शोककळा पसरली. आपले जीवन हेच आपले कार्य मानणाऱ्या डॉ. कमलाबाई देशपांडे यांच्यासारख्या सेवाव्रती पुन्हा होणे नाही.
– अमेय गुप्ते