- आमदार संजय जगतापांच्या वक्तव्यावर नाराजी
नायगाव (पुणे) – आमच्या गावांची नावे आल्याने सर्वच ग्रामस्थ नाराज असून कोणत्याही परिस्थितीत सर्वांनाबरोबर घेऊन विमानतळासाठी आमचा विरोध राहणार आहे. विमानतळाचे हे भूत कसल्याही परिस्थितीत आमच्या मानगुटीवर बसवून घेतले जाणार नाही, असा निर्धार पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील रिसे, पिसे गावांतील नागरिकांनी केला आहे.
पुरंदर तालुक्यात होत असलेल्या विमानतळाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे नुकतीच बैठक पार पडली .त्या बैठकीमध्ये पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी नियोजित विमानतळाच्या जागेत बदल करून रिसे, पिसे, पांडेश्वर या गावांच्या परिसरात विमानतळ करण्यास हरकत नाही, असे म्हटले होते.
याबाबत रिसे-पिसे येथील नागरिकांची बैठक घेऊन या भागात विमानतळ करण्यास तीव्र विरोध दर्शवित आमदार जगतपा यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. व याबाबत पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांना निवेदन दिले आहे.
रिसे, पिसे ही गावे सदन आहेत.या गावांमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी या गावांना मिळत असून शेतकऱ्यांनी ती बागायती केली आहे.
गेली 2 वर्षे चांगल्या प्रकारचा पाऊस पडत असून येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळी तयार केली आहेत. त्यामुळे फळबागा लागवडीखालील क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या भागातील शेतकऱ्यांना शेती सोडून उत्पन्नाचा दुसरा कोणताही मार्ग नाही, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विमानतळासाठी जागा देण्यासाठी एकही शेतकऱ्यांची तयारी नाही.
जर जबरदस्तीने आमच्या जमिनीवर विमानतळ लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.तरी शासन दरबारी सदर सूचित केलेल्या जागेचा विचार होऊ नये आशीही मागणी निवेदनात केल्याचे रिसेचे माजी सरपंच विश्वास आंबोले, पिसेचे माजी सरपंच गणेश मुळीक यांनी सांगितले. या निवेदनाच्या प्रती शासनाच्या वरिष्ठ पातळीवर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.