मंचर (पुणे) –आंबेगाव तालुक्यात सध्या टोमॅटोला 20 किलोच्या क्रेटला 500 ते 600 रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेला शेतकरी आता सावरू लागला आहे.
आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. नारायणगाव येथे असणाऱ्या टोमॅटो बाजारपेठेमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड करतात. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी 50 टक्के शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड केली नाही, त्यांना मात्र काहीही फायदा होत नाही. त्यामुळे ठराविकच शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळत असून बाकी शेतकरी मात्र अडचणीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे पीक नियोजन कोलमडले. या कालखंडामध्ये काही शेतकऱ्यांनी तरकारी पिके घेतली. काही शेतकऱ्यांनी तरकारी पिके न घेता ऊस लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी शेती पडीक ठेवली. करोना व्हायरसची धास्ती वाढत असली तरीही संचारबंदी उठवली असल्याने सर्वत्र तरकारी पिकांची विक्री करता येते. तसेच बाजारपेठेतही ग्राहक येत असल्याने तरकारीचे बाजारभाव वाढले आहेत.
20 किलोच्या टोमॅटोच्या क्रेटला पाचशे ते सहाशे रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी समाधानी आहे. मात्र दरवर्षी जितके शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घ्यायचे. त्यांच्या तुलनेत यावर्षी निम्म्यापेक्षा कमी शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे टोमॅटो बाग लावणारा शेतकरी मालामाल तर बाकी शेतकऱ्यांच्या हातात काहीच नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.