नवी दिल्ली – दिल्लीमध्ये वीजेचा कोणताही पेचप्रसंग उद्भवणार नसल्याची ग्वाही केंद्रीय उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी दिली. उर्जा मंत्रालयाचे अधिकारी, वीज उत्पादक बीएसईएस आणि टाटा पॉवर यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
दिल्लीचे उर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी दोन दिवसांत कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्ली अंधारात राहू शकते. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवड्यासारखी भीषण स्थिती येऊ शकते, अशी शक्यता शनिवारी व्यक्त केली होती. सिंह यांनी या संदर्भात रविवारी खुलासा केला.
वीजेची मागणी अपेक्षेपेक्षा खूप वेगाने वाढली. देशातील औष्णिक वीज प्रकल्प अधीच कोळशाच्या तुटवड्यामुळे गंभीर परिस्थितीला तोंड देत आहेत. देशातील 135 औष्णीक विद्युत प्रकल्पांपैकी 104 प्रकल्पांमध्ये एक आठवडा पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. तर 72 प्रकल्पांमध्ये तीन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा आहे. या प्रकल्पांमधून 89.5 गेगा वॅट वीजनिर्मिती होते.
रॉयटर या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रधान म्हणाले, वीज प्रकल्पांमध्ये किमान सरासरी इतका साठा आहे. तो चार दिवसांपेक्षा अधिक काळ पुरू शकेल. कोळशाच्य साठ्याची दररोज पाहणी केली जात आहे. कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या संपर्कात मी नियमितपणे आहे.
मुखख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीत वीजेची आणीबाणीची स्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. तीही केंद्रीय मंत्र्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, दिल्लीच्या मागणी एवढी वीज पुरवण्यात येत आहे. हा पुरवठा कायम ठेवण्यात येईल. गेलच्या व्यवस्थापकीय संचालकांना वीज केंद्रांना पुरेसा गॅस पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.