नगर – गुलमोहर रोडवर, नरहरीनगर परिसरातील नाल्याची सफाई येत्या तीन दिवसांत न केल्यास आयुक्तांच्या दालनात नाल्यातील गाळ टाकत आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक अजिक्या बोरकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कोहिनूर मंगल कार्यालय परिसर, नरहरी नगर, मधूबन कॉलनीसह गुलमोहोर रोड परिसरातील समस्यांची पाहणी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केली. यावेळी नगरसेविका शोभा बोरकर, मनसुख वाबळे, माजी नगरसेवक अजिक्या बोरकर, कुमार नवले, डॉ.अरविंद अनचवले, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोरकर म्हणाले, दरवर्षीच पावसाळ्यात या भागात नाले पाणी नागरिकांच्या घरात शिरते. याबाबत पावसाळ्या पूर्वी या सर्व परिस्थितीची माहिती मनपा प्रशासनाला दिली आहे. तसेच आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला असता ते फोन देखील घेत नाही. अनेक नाल्यातून गाळ काढला मात्र, तो पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना मोठ्या समस्याला सामोरे जावे लागते.
कर भरून देखील महापालिका स्थानिक नागरीकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसांत या परिसरातील सर्व नाल्याची सफाई न केल्यास थेट आयुक्तच्या दालनात गाळ टाकत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे.