नगर -नगरकरांच्या योगदानामुळे भारत स्वच्छता अभियानामध्ये नगर शहर कचराकुंडीमुक्त शहर म्हणून देशात गणले गेले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांचे आभार मानले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कचरा उचलण्यासाठी नविन 65 वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांची पाहणी आ. जगताप यांनी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक सागर बोरूडे, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, आरिफ शेख, विजय गव्हाळे, उपायुक्त दीनेश सिनारे आदी उपस्थित होते.
महापौर वाकळे म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळे नगर शहराला भारत स्वच्छता अभियानामध्ये केंद्रशासनाने थ्री स्टार मानांकनाचा बहुमान दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही चांगले काम केले आहे. पूर्वी नगर शहरामध्ये ठिक-ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
नगर शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दिल्यामुळे नगर शहरातील सर्व कचरा उचलला जात आहे. त्यामुळे कचराकुंडीमुक्त शहर होण्यास मदत झाली. नागरिकांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखून घरात साचलेला कचरा घंटागाडीमध्ये टाकण्याचे सहकार्य केले. यापुढील काळातही नगर शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे अवाहन केले.