नगर – वर्षअखेर जवळ आला की महापालिकेच्या वसुली विभागाकडून मालमत्ता कर वसुलीचा घाट घालता जातो. मात्र वर्षभर कर वसुलीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असते.त्यामुळे दरवर्षी जेमतेमच कर वसुली होते. मार्चअखेर आता दोन महिन्यावर आले तरी महापालिकेच्या वसुली विभागाकडून अपेक्षित मालमत्ता कराची वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. वरवर वसुलीची मोहिम राबविण्यात येत असल्याने वर्षभरात केवळ 60 कोटी 69 लाख मालमत्ता कराची वसुली झाली आहे.
या आर्थिक वर्षात एप्रिल ते जुनपर्यंत मालमत्ताधारकांना सवलत, ऑगस्ट महिन्यात शास्तीमाफी आणि नोव्हेंबरमध्ये लोकअदालत घेवूनही मालमत्ता कर व पाणीपट्टीची थकबाकी अपेक्षेप्रमाणे वसुली झाली नाही. अजूनही 187 कोटी 36 लाख रुपये थकबाकी आहे. महापालिका आयुक्तांनी दरमहा किमान 20 टक्के तरी वसुली करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना दिले असून एक लाख रुपयापर्यंत थकबाकीदारांवर जप्ती व नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचे आदेश देवूनही प्रभाग अधिकाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.
महापालिका वसुली विभाग वर्षभर कर वसुलीकडे फारसे लक्ष देत नाही. वर्षअखेर जवळ आलेली वसुलीवर भर दिला जातो. त्यातही चालू वर्षाची थकबाकी जमा होते. मात्र वर्षानुवर्ष थकबाकी असलेल्यांकडून वसुली होत नसल्याने ही थकबाकी वाढत चालली आहे. प्रभाग अधिकाऱ्यांना वसुलीचे उद्दीष्टे देण्यात आले आहे. मात्र या अधिकाऱ्यांकडून वसुलीबाबत टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे. प्रभाग अधिकारी व कर वसुली निरीक्षकांना दरमहा 20 टक्के वसुली जमा झाली पाहिजे, असे स्पष्ट करून एक लाख रुपयांवर थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर मालमत्ता जप्ती व नळ कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहे. मात्र अद्यापही एकाही प्रभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही. तसेच वसुली देखील ठप्प आहे.
अशा पद्धतीने वसुली विभागाचे कामकाज चालले तर महापालिकेची आर्थिक स्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत. एक लाख रुपयांच्यावर थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्या कारवाई आदेश आयुक्तांनी दिले असतांनाही अजूनही ही यादी देखील तयार झालेली नाही. ऑगस्ट महिन्यात महापालिका प्रशासनाने महिनाभर दिलेल्या शास्तीमाफी योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सुमारे 96 हजार थकबाकीदारांपैकी केवळ 12 हजार 131 थकबाकीदारांनीच या योजनेचा लाभ घेतला. सवलत काळात महापालिकेच्या तिजोरीत 18.56 कोटींची भर पडली. तर त्यासाठी तब्बल 12.88 कोटींवर महापालिकेला पाणी सोडावे लागले. म्हणजे शास्तीमाफी देऊनही अपेक्षित वसुली झाली नाही. लोकअदालतमध्ये केवळ एक कोटी सात लाख रुपये वसुल झाले. अजूनही 187 कोटी थकबाकी आहे. मागील थकबाकी 248 कोटींची असून त्यापैकी केवळ 60 कोटी वसुली झाली आहे.
पुन्हा लोकअदालत?
महापालिका लोकअदालतीमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरी पुन्हा 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लोकअदालतमध्ये तब्बल 23 हजार प्रकारणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले आहे. याबाबत महापालिका अधिकारी वर्गामध्ये नाराजी आहे.
सव्वालाख मालमत्ताधारक
नगर शहरात 1 लाख 23 हजार 232 मालमत्ताधारक आहे. त्यात निवासी 78 हजार 875, अनिवासी 13 हजार 799 तर मोकळ्या जागांची संख्या 30 हजार 558 आहे. शहरात 52 हजार 481 नळ कनेक्शन आहेत. ही तफावत अनेक वर्षापासून आहे.