नगर – पाथर्डी तालुक्यातील मिरी – तिसगाव व इतर 43 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल 154 कोटी 47 लाख रुपये मंजूर झाले असून तालुक्यातील लाभधारक गावामध्ये या योजनेचे काम देखील सुरू करण्यात आले आहे. मात्र पाईपलाईनसाठी सुरू असलेले खोदकाम निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे ठेकेदाराचे पितळ करंजी परिसरातील शेतकऱ्यांनी उघडे पाडले असून त्याची चौकशी केली जाणार आहे. असे असतांना आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या पाणीयोजनेच्या कामाचे भूमिपूजन करणार आहे. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असून अशा निकृष्ट असलेल्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री करणार का असा सवाल परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मिरी- तिसगाव पाणी योजनेअंतर्गत जुनी व काही नव्याने समावेश असलेल्या 43 गावांसाठी पांढरीपूल पासून पुढे सुमारे तीनशे किलोमीटर नवीन पाईपलाईन खोदून लाभधारक गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी 154 कोटी 47 लाख रुपये जनजीवन मिशन योजनेमधून मंजूर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा निधी मंजूर झाला असून काही महिन्यापूर्वी या योजनेच्या कामाला सुरूवात झाली आहे. असे असतांनाही पुन्हा भूमिपूजना घाट घालण्यात आला असून खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या योजनेच्या कामाचा शुभारंभ करणार आहेत. हा परिसरात चेष्टेचा विषय झाला आहे.
राघुहिवरे, लोहसर, खांडगाव, भोसे, वैजूबाभळगाव, करंजी या भागात या योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी चव्हाट्यावर आणला आहे. शासन नियमाप्रमाणे 75 सेंटीमीटर खोली असणे अपेक्षित आहे.प्रत्यक्षात 30 ते 35 सेंटीमीटर म्हणजे निम्म्यावरच खोली घेत लगेच पाईप टाकून ही पाईपलाईन काम पूर्ण करण्याचा सपाटा संबंधित ठेकेदाराने लावला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराच्या कामगारांसमोर या खोदलेल्या पाईपलाईनची मोजणी केली आहे. या पाईपलाईनमुळे अनेक रस्त्यांचे तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कामामुळे पाईपलाईन कधीही फुटून वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पाणी योजनेच्या कामाला विरोध दर्शविला आहे. याबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहे.
अशा निकृष्ट कामाचा पुन्हा शुभारंभ करून काय साध्य करायचे आहे, तसेच निकृष्ट काम असतांनाही पालकमंत्री त्या कामाचे भूमिपूजन करणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहेत. 154 कोटी 47 लाख रुपये खर्च करतांना तो पारदर्शकपणे खर्च व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीतर्फे अजित पवार देखील करणार भूमिपूजन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या पाणीयोजनेसाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे माजीमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी याचे श्रेय घेण्यासाठी या मिरी-तिसगाव पाणीयोजनेच्या कामाचा शुभारंभ येत्या 6 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते आयोजित केला आहे. त्याचे श्रेय त्यांना मिळून नये म्हणून माजी आमदार यांनी घाईघाईत उद्या या योजनेचे भूमिपूजन पालकमंत्र्यांचे हस्ते करण्याचे नियोजन केले.