श्रीगोंदा –बिघाड झाल्याने पिकअपचा ताबा सुटून नगर-दौंड महामार्गावरील घारगाव शिवारात दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहने अक्षरशः चक्काचूर झाली.
गुलाब मुस्ताप शेख, मुस्ताप शेख, बाबर गुलाब शेख (तिघे रा. पिंपळगांव फुनगी ता.राहुरी), सागर भिमाजी फुले (रा. केडगाव, ता.दौंड) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केडगाव ता. दौंड येथील प्रवीण जगताप यांच्या चारचाकी माल वाहतूक करणाऱ्या पिकअप (क्र.एम एच 42 ए क्यू 9658) मध्ये गाडीचा चालक सागर भिमाजी फुले (रा.केडगाव) याने गूळ भरून नगरकडे भरधाव वेगाने येत असताना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील घारगाव येथील निलगिरी धाब्याच्या परिसरात गाडीचा जॉइंट तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी होऊन नगरकडून काष्टी येथील जनावरांच्या बाजारात जाणाऱ्या चारचाकी छोटा हत्ती (क्र.एम एच 12 ई क्यू 9041) या वाहनाला समोरासमोर जोराची धडक दिली.
या भीषण धडकेत चारचाकी छोटा हत्ती गाडीचे मोठे नुकसान होऊन गाडीतील तिघे जण आणि पीकअपचा चालक हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती समजताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.