नगर, {वैष्णवी कदम} – शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. महापालिकेने विविध ठिकाणी बांधलेल्या 32 सार्वजनिक स्वच्छतागृहांतूनच महिलांसाठी सुविधा करण्यात आली असली तरी या परिसरात पुरुषांची नेहमी गर्दी असल्याने महिलांची कुचंबना होत आहे. महापालिकेने फक्त महिलांसाठीच स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारलेली नाहीत.
मनपात पाच महिला महापौर होऊन गेल्या तरी त्यांच्या काळात फक्त या विषयावर चर्चाच झाल्या. महिलांसाठीच्या स्वतंत्र स्वच्छतागृहाची गरज प्रकर्षाने मांडली गेली. पण त्यानुसार कार्यवाही अद्याप झालेली नाही.
दरम्यान, शहरात केवळ जागाच उपलब्ध नसल्याने शौचालयांची उभारणी करता आली नाही, अशी खंत माजी महिला महापौर रोहिणी शेंडगे यांनी ‘दै.प्रभात’जवळ व्यक्त केली. त्यामुळे महिलांच्या शौचालयाबाबत प्रशासन आणि पदाधिकारी किती उदासिन होते? याबाबत धक्कादायक बाब चव्हाट्यावर आली आहे.
शहरामध्ये मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्या कापड बाजार, गंज बाजार, चितळे रोड परिसरासह अनेक भागांत महिलांसाठी एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. त्यामुळे बाजारात येणार्या महिलांची कुचंबणा होत आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होत आहे.
कापड बाजार वा बाजारपेठेत काही खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलांची अडचण होते. तेथील काही दुकानांतून स्वच्छतागृहाची सुविधा आहे. पण सार्वजनिक स्तरावर महिलांसाठीची अशी स्वतंत्र सुविधा नाही.
केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणावेळी महापालिकेने स्वच्छतागृहे सजविली होती. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या कमी आहे. ग्रामीण भागातून येणार्या महिलांनाही असुविधेचा सामना करवा लागतो. शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या 13 तर सामुदायिक स्वच्छतागृहांची संख्या 19 आहे.
यामध्ये महिला व पुरुषांसाठी समसमान जागा देण्यात आली आहे. म्हणजे एकाच स्वच्छतागृहामध्ये एका भिंतीआड पुरुष आणि महिला दोघांसाठी जागा आहे. मात्र, असे असले तरी महिलांसाठी वेगळे व स्वतंत्र स्वच्छतागृह आवश्यक आहेत.
नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसह पुरुषांची मोठ्या प्रमाणावर शहरात वर्दळ असते. विशेषतः मंगळवारी आठवडे बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची वर्दळ जास्त असते. शहरातील नागरी वसाहती उच्चभ्रू झाल्या व सर्वच प्रमुख रस्त्यांवर नागरीकरण वाढून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, परंतु शहरात आवश्यक प्रमाणात सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. पुरुष मंडळी अशा स्थितीत कोठेही निर्मनुष्य जागा पाहून आडोसा शोधतात. पण महिलांची मात्र कुचंबना होते. किमान शहरातील मुख्य ठिकाणांच्या परिसरात तरी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारावीत अशी मागणी होत आहे.
मी चप्पल विक्रेते आहे. महापालिका काही काम करत गांधी मैदानात १० रुपये घेतात तर गंजबाजारात ५ रुपये अतिशय अस्वच्छ शौचालय आहे तिथे पाणी सुद्धा नाही खूप लांब चालत जावे लागते. खरेदीनिमित्त गेल्यावर हमखास तीन-चार तास वेळ जातो. अशावेळी पाणी कमी पिणे, चहा न घेणे हाच एकमेव उपाय महिलांसमोर असतो. कारण, बाजारपेठेत स्वच्छतागृहे नाहीत. एखाद्या ठिकाणी असेल तर तेथे अस्वच्छतेमुळे महिला जात नाहीत. यावर पालिकेने तोडगा काढावा व महिलांना वेगळे स्वच्छतागृह द्यावे.
अलका शेलार, चप्पल विक्रेते
मी महापौर असताना महिलां शौचालय हा विषय होता. गंज बाजारातील शौचालय पडून बांधायचे होते पण ते हि झाले नाही तेथील नागरिकांचा यासाठी विरोध होता. कापड बाजारात स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी जागा उपलब्ध केली होती. अनधिकृत ताबा असल्याने ते काही झाले नाही. बाजारपेठ असल्याने आजूबाजूला दुकान होती. नागरिकांची मानसिकता नव्हती. सुरेखा कदम, माजी महापौर
आम्ही प्रयत्न केला होता महिलांसाठी शौचालया बांधण्यासाठी परंतु जागेचा प्रश्न होता. जागा काय मिळाली नाही सिद्धी बाग इथे महिलांसाठी शौचालय बनवण्याचे काम सुरु आहे. माजी महापौर,रोहिनीताई शेंडगे