विरोधकांनाही विश्वासात घ्या – कॉंग्रेसची केंद्राकडे मागणी
नवी दिल्ली – कॉंग्रेसने काश्मीरातील सध्याच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली असून सरकारने काश्मीरविषयी राजकीय संवादाची प्रक्रिया सुरू करावी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विश्वासात घेऊन त्यांना काश्मीर खोऱ्यात जाण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत ही मागणी केली.
सरकारने जम्मू काश्मीरातील ज्या नेत्यांची धरपकड केली आहे किंवा ज्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले आहे, त्यांची त्वरीत सुटका केली पाहिजे. लोकांचा आवाज ऐकला गेला पाहिजे यासाठी विरोधी पक्ष नेत्यांनाही काश्मीरात मुक्तपणे वावरू दिले पाहिजे त्याशिवाय जनमानसाचा अंदाज येणार नाही आणि त्यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही असे ते म्हणाले.
काश्मीर खोऱ्यातील नेटवर्क अजूनही बंद आहे. त्यामुळे तिथल्या बातम्या नेमकेपणाने अजून लोकांना समजत नाहीत. तेथील लोकांमध्ये अजून मोठ्या प्रमाणावर दडपशाही आणि भीतीचे वातावरण आहे. हे वातावरण निवळण्याची गरज आहे त्याशिवाय तेथील स्थिती सुरळीत होऊ शकत नाही असेही शर्मा म्हणाले.
सरकारने काश्मीरची पुर्ण नाकाबंदी केली असून त्या स्थितीला आज नऊ दिवस झाले आहेत. काश्मीरात भेटीसाठी निघालेल्या राजकीय नेत्यांना श्रीनगर विमानतळावर अडकवून ठेवले जाते आणि त्यांना तेथूनच माघारी परतावे लागते ही स्थिती आणखी किती दिवस चालणार आहे असा सवालही त्यांनी केला आहे.