बॉलीवूडची आघाडीची आणि अनेकदा वादात असणारी अभिनेत्री कंगना राणावत सध्या जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमुळे चर्चेत आली आहे. तत्पूर्वी कंगनाला पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. गेल्या दशकभरामध्ये कंगनाने बॉलीवूडमध्ये शानदार म्हणावा असा प्रवास केला आहे.
यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना कंगनाने आपल्या खासगी आयुष्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर आपल्या लग्नाविषयी सुरू असलेल्या सर्व अफवांचे खंडनही केले. सध्या माझा लग्नाचा कोणताही आणि कसलाही विचार नसल्याचे तिने स्पष्टपणाने सांगितले. हे सांगत असतानाच मी “सिंगल’च बरी आहे, असेही म्हटले आहे.
मला आयुष्यात अजून बरंच काही करायचं आहे, असं ती म्हणते. कंगनाला “तनु वेडस् मनु’चा तिसरा भाग बनावा असे वाटते. या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. स्क्रिप्ट आणि प्रोजेक्ट जर सशक्त असेल तर मला “तनु वेडस् मनु’चा आणखी एक सिक्वल बनवायला नक्की आवडेल, असे कंगना सांगते.