नवी दिल्ली: सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीच्या तेलसाठ्यांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर बराचसा तेल साठा जळून गेला आहे. शिवाय तेलाच्या किंमतीही भडकल्या आहेत. तरिही भारत हा सौदी अरेबियाचा तिसऱ्या क्रमांकाचा तेल खरेदीदार राष्ट्र असल्याने, भारताला करण्यात येत असलेल्या पुरवठ्यात कोणतीही कपात करण्यात येणार नसल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले असल्याची माहिती भारताच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिली आहे. भारत सरकार सौदी रिफायनरी अरामको यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असेही मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
या ड्रोन हल्ल्यामुळे प्रतिदिन 5.7 दशलक्ष बॅरेल इतके तेल उत्पादन करत असलेल्या सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात निम्म्याने घसरण झाली आहे. भारत आपल्या गरजेच्या 83 टक्के तेल सौदीकडूनच आयात करतो. इराकनंतर सौदी अरेबिया हा त्यांचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. वर्ष 2018-19 या आर्थिक वर्षात भारताने 40.33 दशलक्ष टन कच्च्या तेलाची खरेदी केली होती. त्यावेळी देशाने 207.3 दशलक्ष टन तेल आयात केले होते.
सरकारी मालकीच्या तेल रिफायनरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सौदी अरामकोने अशी माहिती दिली आहे की, भारताच्या तेलपुरवठ्यात कोणताही मोठा व्यत्यय येणार नाही, परंतु पुरवठा सुरू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ग्रेडसाठी सवलत मागितली आहे.