कान्हे, (वार्ताहर) – लोणावळा ते निगडी या मार्गावर पीएमपी बस धावते. मात्र, या मार्गावरील अनेक ठिकणच्या बस थांब्यावर प्रवाशांसाठी निवारा शेडच नाही. परिणामी प्रवाशांना उन, पावसात उभे राहून बसची वाट पहावी लागते. त्यामुळे या मार्गावर बस थांब्यांवर शेड उभारण्यात यावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे.
लोणावळा ते निगडी या मार्गावरील प्रवाशांची संख्या जास्त आहे. परिणामी हा मार्ग पीएमपीसाठी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरणारा वाहतुकीचा मार्ग आहे. पण या मार्गावर बस स्थानकांचा अभाव दिसून येत आहे. तळेगाव स्टेशनपासून ते व लोणावळा स्थानकापर्यंत कुठेही बस थांबे नाहीत.
तसेच बस स्थानकाचा फलक आढळून येत नाही. त्यामुळे प्रवाशांना नक्की कुठे थांबावे हा मोठा प्रश्न असतो. बस जशी थांबेल तसे प्रवाशांना बसच्या मागे पुढे धावावे लागते.
सध्या उन्हाच्या झळा जाणवत आहेत. उन्हाळ्यात बस स्थानकावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे. दुपारच्या वेळी उन्हात बसची वाट पहावी लागते आणि दुपारीच्या वेळेत बस ४५ मिनीटे ते एक तासाने धावते. त्यामुळे एक बस गेली तर, दुसऱया बस साठी किमान तासभर उन्हात उभे राहून बसची वाट पहावी लागते. बस स्थानकाच्या ठिकाणी सावलीसाठी आसरा नाही. त्यामुळे वाढत्या उन्हात बस थांब्याची गरज भासत आहे
ज्या गावात बस थांबते त्या गावातील ग्रामपंचायत, राजकीय पक्ष, संघटना व नेत्यांच्या निधीतूनही थांबा उभारला जात नाही. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून उन, पावसात प्रवासी बसची वाट पहात उभे असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे बस स्थानकाच्या निवारा शेडचा वनवास कधी संपेल असे प्रवासी विचारत आहेत. सर्वांनी पुढाकार घेऊन बस स्थानका जवळ निवारा शेड उभारावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
….