सुप्रिया सुळे यांचे ट्विट ः तातडीच्या कारवाईची मागणी
कुरकुंभ- कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषणाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याने ग्रामस्थ कंटाळून गेले आहेत. याबाबत कुरकुंभ ग्रामपंचायतीने एमआयडीसीमधील काही कंपन्या जल, वायू प्रदूषण करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची मागणी करीत त्यांना निवेदन दिले होते. याबाबत दैनिक “प्रभात’ने “कुरकुंभकरांच्या मानगुटीवर रासायनिक बॉम्ब’ या मथळ्याखाली बुधवार (दि. 25) वृत्त प्रसिद्ध केली होती. या सडेतोड वृत्ताची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. 26) रोजी ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी कार्यालयांना प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांची दखल घेऊन तातडीने अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये काही रासायनिक कंपन्यांकडून नियम धाब्यावर बसवून रसायुक्त पाणी प्रक्रिया न करता ओढ्यात सोडण्यात येत आहे. या वसाहतीमध्ये केमिकल, औषध निर्मिती, सौदर्य प्रसाधनाची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. यातील अनेक कंपन्यांकडून नियमाला हरताळ फासला जात आहे. वसाहतीच्या स्थापनेपासून केमिकलची विल्हेवाट लावण्यात संबंधित कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आंदोलने केली होती. यापूर्वी कुरकुंभ ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केलेल्या होत्या. परंतु अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करण्याची नौटंकी करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत कधीही कुरकुंभ गावास न्याय दिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे झुकते माप कंपन्यांकडेच असल्याचे येथील चित्र उभे राहिले आहे. कुरकुंभ परिसरातील नागरिकांच्या व्यथा मांडण्यासाठी सुळे यांनी दखल घेतली आहे. याबाबत खासदार सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. त्यामुळे कंपन्यांना चाप बसेल, अशी आशा पल्लवित झाल्या आहेत.
- खासदार सुळे यांनी केलेले ट्विट
कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील कारखान्यातून उत्सर्जित होणारे रसायनयुक्त सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. त्यामुळे या भागात प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. कृपया आपण याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, ही विनंती.