पुणे – महात्मा गांधी ही एक मोठी परिसंस्था आहे. त्यांच्यावर एक चित्रपट काढावा असे माझ्याही मनात आहे. गांधीजींवर परिपूर्ण असा एपिक चित्रपट अद्याप बनवला गेला नाही, तो बनवला पाहिजे, असे मत ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे माजी संचालक प्रकाश मगदूम यांनी लिहिलेल्या तसेच “हार्पर कॉलिन्स’ यांनी प्रकाशित केलेल्या “द महात्मा ऑन सेल्युलॉईड…ए सिनेमॅटिक बायोग्राफी’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेमाडे उपस्थित होते. याशिवाय अभिनेते गिरीश कुलकर्णी, लेखक अभिजीत रणदिवे, आयकर विभागाचे आयुक्त संग्राम गायकवाड, “आशय फिल्म क्लब’चे सतीश जकातदार उपस्थित होते. क्लब आणि विजय जाधव प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ समीक्षिका रेखा इनामदार-साने यांनी सूत्रसंचालन केले. जकातदार यांनी प्रास्ताविक केले. गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
महात्मा गांधी जन्माला येऊन दीडशे वर्ष लोटली. त्यांचे अजूनही जनमानसावर गारुड आहे, असे सांगून पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा मगदूम यांनी कथन केली. गांधीजी गेल्यावरही त्यांच्यावर अनेक चित्रपट बनवले गेले. गांधीजी कधीच कालबाह्य होणार नाहीत. सत्य, प्रेम, बंधुभाव, सहानुभूती, सहसंवेदना, निर्भयता, क्षमाशीलता, अहिंसा ही सगळी मूल्ये मानवाला तारणारी मूल्ये आहेत, जी गांधीजींनी आपल्याला शिकवली. या मूल्यांना मरण नाही. असे प्रभावळकर म्हणाले.
सध्या जाती-धर्माच्या झुंडी बांधून लढवण्याचा काळ आहे. अशा परिस्थितीत असे पुस्तक लिहिणे म्हणजे औचित्याचा भंग करण्यासारखे आहे अशी. मगदूम यांनी लिहिलेला तपशील हा पांथस्थाला रस्त्यात पाणपोई असावी असा आहे.
गिरीश कुलकर्णी, लेखक-अभिनेते
झोप न येणारे मराठी चित्रपट बनवले पाहिजेत
मराठी चित्रपट पाहताना झोप येते. आजपर्यंत एकही चांगला चित्रपट मराठीमध्ये बनवला गेला नाही. थिएटरमध्ये जाऊन झोपण्याची जागा म्हणजे मराठी चित्रपट असे आजही आहे. झोप न येणारे मराठी चित्रपट बनवले पाहिजेत, अशी टिप्पणी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केली. त्यांच्या “कोसला’ कादंबरीवर चित्रपट बनवण्याचा दोघांनी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला आता तिसरा प्रयत्न सुरू आहे, असे नेमाडे म्हणाले.