मुंबई- आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेण्याची काहीही आवश्यकता नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वत:चे प्रवक्त आहेत, नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडतील, उगीच काहीतरी बोलून संभ्रम का निर्माण करत आहात, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना टोला हाणला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीवर सूचक वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या भेटीचा उल्लेख करत “राष्ट्रवादीतून कुणाला भाजपमध्ये जायचे असल्यात त्याची ती वैयक्तिक भूमिका असेल. पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपसोबत जाणार नाही,’ असे या लेखात राऊतांनी म्हटले होते.
राऊत यांच्या या वक्तव्यानंतरच अजित पवारांभोवती पुन्हा संशयाची धुके निर्माण झाले होते. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकतात, अशा चर्चांना ऊत आला होता.
संजय शिरसाटांनाही खडेबोल
पवार यांनी पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनाही खडेबोल सुनावले. “अजित पवांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडून आमच्यासोबत यावे. अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे शिरसाट यांनी म्हटले होते. या वक्तव्यावरही अजित पवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. अजित पवार म्हणाले, अरे मी अजून कुठे गेलेलो नाही. कुठे आलेलो नाही. त्याआधीच ते आले तर आम्ही जाऊ, अशी भाषा का करत आहात? माझी काही भूमिका असेल तर मी ती स्वत: मांडेन ना. त्याआधीच माझ्या येण्यावर येवढी काय चर्चा करताय.
काही लोकांचे माझ्यावर एवढे काय प्रेम आहे, हेच मला समजेनासे झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी खडेबोल सुनावल्यानंतर संजय शिरसाट यांनीही आपल्या वक्तव्यावरून कोलांटउडी मारली. मी “जर’ अजित पवार भाजपसोबत आले तर, असे म्हणालो होतो. मी जर-तरची भाषा केली होती, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.