मुंबई – विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज(दि.2, बुधवार) ठणकावून सांगितले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय स्पष्ट केला.
नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटे-नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली, असे जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक शरद पवार यांनी बोलवली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही बैठक होणार असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.