मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्य सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कथित मनी लाँडरिंग प्रकरणात कारवाई केली आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना न्यायालयात योग्य तो न्याय मिळेलच असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केला.
राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्यामधील व्यवहार संपूर्ण नियमाला धरून केले असल्याचे ते म्हणाले. राज्यातील नामांकित वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीनुसार आम्ही हे टेंडर भरले होते. नागपूर जिल्ह्यातील बंद पडलेला कारखाना अहमदनगर जिल्ह्यात आणून त्याला चांगल्या क्षमतेने सुरु ठेवला आहे, असा दावा त्यांनी केला.
या कारखान्यामधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोय झाली आहेच, सोबतच कामगारांनाही न्याय मिळाला आहे. तरीदेखील झालेल्या चौकशी दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली असून न्यायलयात आम्हाला योग्य न्याय मिळेल, असा विश्वास तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.