नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून चीनच्या सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारतीय लष्कराने प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलिकडे हालचाली सुरू केल्याचा चीनचा दावा फेटाळला आहे. भारतीय लष्कराच्या हालचलींना चिनी सैन्याने रोखले असल्याचे या दाव्यात म्हटले होते. मात्र या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे भारतीय लष्कराने स्पष्ट केलेले आहे.
सिक्कीमच्या पश्चिमेकडील प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलिकडे जाऊन भारतीय लष्कराच्या हालचाली झाल्याचे चीनने म्हटले होते. मात्र अशाप्रकारे “एलएसी’ ओलांडून भारतीय लष्कराने काहीही हालचाल केलेली नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी हे स्पष्टिकरण दिले आहे.
भारताने नेहमीच सीमेवरील सैन्याच्या व्यवस्थापनाबाबत खूपच जबाबदारीने कृती केलेली आहे. मात्र याच बरोबर भारत स्वतःची सार्वभौमत्व आणि सुरक्षितता अबाधित राखण्यास कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कराला चीनच्या सीमेवरील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीची पूर्ण माहिती आहे. तसेच तेथील तथ्याला बांधील आहे. भारतीय लष्कराच्या सर्व हालचाली प्रत्यक्ष ताबा रेषेच्या अलिकडे, भारतीय हद्दीतच होत आहेत. सीमा भागात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राखण्याच्या सामायिक उद्देशाला कायम राखण्यासाठी भारतीय लष्कर कटिबद्ध आहे, असेही श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
या आठवड्याच्या प्रारंभी गलवान खोऱ्याच्या भागात प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून चीनच्या हद्दीत भारतीय सैन्याने प्रवेश केल्याचा आरोप चीनी सैन्याने केला होता. तर भारतीय लष्कराच्या हालचालींना रोखण्यासाथी चीनी सैन्याने काही उपाय योजना केल्याचे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिले होते. त्या पार्श्वभुमीवर हे स्पष्टिकरण देण्यात आले.