थोपटे यांची नाराजी दूर करण्यात यश
मुंबई : रखडलेल्या खातेवाटपात कॉंग्रेसच्या हाती वजनदार खाती येणार नसल्याच्या शक्यतेमुळे पक्षात अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. मात्र, कॉंग्रेसमध्ये कुठलीही अस्वस्थता नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे वृत्त आहे. ती रस्सीखेच खातेवाटपाच्या विलंबासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. तशातच महत्वाची खाती वाट्याला येण्याची चिन्हे नसल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजी असल्याचेही पुढे आले.
मात्र, येथे पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी त्याचा इन्कार केला. भोरचे कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची नाराजी दूर केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. मंत्रिपद न मिळाल्याने थोपटे नाराज असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा संदर्भ देऊन थोरात म्हणाले, मी मंगळवारी रात्री थोपटे यांच्याशी बोललो. कॉंग्रेस पक्ष म्हणजे एक कुटूंब आहे.
त्यामुळे थोपटे यांनी नक्कीच न्याय मिळेल. तीन पक्षांचा समावेश असणाऱ्या आघाडी सरकारचा कॉंग्रेस घटक आहे. तीन पक्षांना सामावून घेण्यात आल्याने आमच्या वाट्याला कमी मंत्रिपदे आली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात प्रत्येकाला स्थान देता येऊ शकत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.