पुणे : करोनाच्या संकटामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली. या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचा फॉर्म्युला अद्याप शासनाकडून निश्चित झालेला नाही. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यातील संभ्रमात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो. वर्षभरापासून करोनामुळे शाळाच बंद ठेवण्यात आल्या होत्या. शासनाने अभ्यासक्रमात 25 टक्के कपात ही केली होती. शासनाने ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले. मात्र हे ऑनलाईन शिक्षण शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले का हा संशोधनाचाच विषय ठरला आहे.
करोनाची परिस्थिती पाहता जूनमध्येही दहावीची परीक्षा घेणे शक्य नसल्याचे कारण पुढे करुन शासनाने दहावीच्या परीक्षाच रद्द करण्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली. अंतर्गत मुल्यमापन करुन या विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. राज्य मंडळ, शिक्षण विभागातील अधिकारी, सल्लागार समिती यांची ऑनलाईन मिटींगही शिक्षणमंत्र्यांनी घेतली. यात केवळ प्राथमिक चर्चा करण्यात आली. अनेकांनी वेगवेगळे पर्याय मांडले. त्यावर एकमत मात्र होऊ शकले नाही. अंतर्गत मुल्यमापनाचे निकष हे सर्वच विद्यार्थ्यांना कितपत व कसे लाभदायक ठरतात याकडे विद्यार्थ्यांसह इतर सर्वांचे लक्ष लागले आहे.
परीक्षेशिवाय परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र देणे हा शैक्षणिक भ्रष्टाचारच ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाद्वारे उत्तीर्ण प्रमाण पत्र देण्यात येणार असले तरी गेले वर्षभर शाळा करोनामुळे बंद होत्या. ऑनलाईन शिकवणे सुरु होते . त्यामुळे अंतर्गत परीक्षा कशा व कधी घेतल्या ? मग गुण कसे देणार ? विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाचा पाया का उद्धवस्त केला जात आहे ? असे अनेक प्रश्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थित केले आहेत.