घोडशाखेतील कालव्याला सोडले पाणी
मंचर- लौकी (ता. आंबेगाव) येथील ओढा पात्रात असणारे सहा बंधारे कालव्याच्या पाण्यामुळे तुडुंब भरले आहेत. गावठाण, मधलामळा, दरेकरवस्ती आणि पाचघर वस्ती येथील नागरिकांचा पिण्याच्या आणि शेती पिकांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे.
हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) डाव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे लौकी येथील ओढा पात्रात असणारे पाण्याचे सहा बंधारे तुडूंब भरले आहेत. उन्हाळ्यामुळे या भागातील बंधारे आणि विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली होती. डाव्या कालव्यातून कळंबलगत असलेल्या घोडशाखेद्वारे पाणी सोडण्यात आले, त्यानंतर कालव्याला असलेल्या चाऱ्यामधून (वितरिका) हे पाणी बंधाऱ्यात सोडल्याने लौकी येथील पाण्याचे सहा बंधारे तुडूंब भरले आहेत.यामुळे साहजिकच शेतीसाठी खोदलेल्या विहिरी आणि बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
या पाण्यामुळे कांदा, ऊस, पालेभाज्या, भुईमूग त्याचबरोबर जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटला आहे, तसेच लौकी गावठाणातला बंधारा तुडूंब भरल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गावठाणातील सार्वजनिक विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. तेथून पाइपलाइनद्वारे पाणी लौकी गावठाण, मधलामळा, दरेकरवस्ती व पाचघरवस्ती येथील कुटुंबाना पुरवले जाते, यामुळे नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.