पोलीस प्रमुखांचा दावा: जनजीवन पूर्वपदावर येतेय
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील तरूण दहशतवादी संघटनांत सामील झाल्याच्या नव्या घटना समोर आलेल्या नाहीत, अशी माहिती त्या राज्याचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी बुधवारी दिली. जम्मू-काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचा दावाही त्यांनी केला.
याआधी काही तरूणांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादी मार्गावर नेले गेले. मात्र, त्यातील बहुतांश तरूणांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यात आम्हाला यश आले, असे सिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काश्मीर खोऱ्यातील स्थितीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, शाळा आणि कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. जनतेने त्यांचा दिनक्रम सुरू केला आहे. अर्थात, दहशतवाद्यांकडून फळ विक्रेत्यांना धमकावले जात असल्याच्या काही घटना दक्षिण काश्मीरमध्ये समोर आल्या. फळे गोळा न करण्याचे फर्मान दहशतवाद्यांकडून सोडले जाते. मात्र, विक्रेते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांचे कार्य सुरळीत होण्याची निश्चिती पोलिसांकडून केली जाते. जनतेला कुणी त्रास देऊ नये यादृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.