लोणी काळभोर – महावितरणच्या तीन कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत मुंबईमध्ये सोमवारी (दि. 24) बैठक होणार आहे.
बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यातील वीज कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, अशी माहिती तांत्रिक वीज कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब सायकर यांनी दिली.
कृती समितीच्या विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती बाळासाहेब सायकर यांनी दिली. वीज कामगार, अभियंते, अधिकारी व कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
फ्रंटलाइन कर्मचारी समजून वीज कामगार, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार, सर्व सहायक, वीजसेवक, व प्रशिक्षणार्थी यांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रथम करोना लसीकरण करून घ्यावे.
करोनामुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाप्रमाणे 50 लाख रुपये मदत मिळावी. तीन कंपन्या करिता जुन्या टिपीएची तात्काळ नियुक्ती करावी. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वीजबील वसुलीकरीता सक्ती करू नये आदी प्रमुख मागण्या आहेत.
महाराष्ट्र स्टेट इलक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना, सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस (इंटक) या सहा संघटनांचा कृती समितीमध्ये समावेश आहे.
या कृती समितीने सोमवारपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलन काळात रुग्णालये व इतर अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे.
मात्र इतर कोणतेही काम अधिकारी व कर्मचारी करणार नाहीत. नागरिकांना या काळात कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे, अशी माहिती सायकर यांनी दिली.