सातारा – रयत शिक्षण संस्थेने कर्मवीरांच्या विचारांशी फारकत घेतली आहे. लोकशाहीतील सत्ता विकेंद्रीकरणाचा विचार संस्थेमध्ये राबविला गेला पाहिजे.
नाही तर ही संस्था एकाच कुटुंबाच्या मालकीची होईल. “कमवा आणि शिका’ या कर्मवीरांच्या विचारधारेला व रयतचे बोधचिन्ह असणाऱ्या वटवृक्षाला एकाधिकारशाहीची वाळवी लागेल, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
रयत शिक्षण संस्थेच्या घटनेप्रमाणे पदसिद्ध अध्यक्ष मुख्यमंत्री असावेत, अशी मागणी त्यांनी केली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्या रोखाने उदयनराजे यांनी राजकीय टोलेबाजी केली.
उदयनराजे म्हणाले, “”छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या रयतेला सोबत घेऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) यांनी स्त्री शिक्षणासाठी कवाडे उघडली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत महात्मा जोतिबा फुले यांनीही मुलींसाठी शाळा सुरु केली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तर मोठ्या उदार भावनेने रयतेसाठी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. मात्र, या वृक्षाला वाळवी लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे.”
रयत शिक्षण संस्थेमध्ये राजघराण्यातील कोणालाही सभासद करुन घेतले नसल्यावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आमच्या कुटुंबाचं रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये मोठं योगदान आहे. मात्र, आमच्या घराण्यातील एकालाही संस्थेत सभासद करुन घेण्यात आलेलं नाही.
संस्थेच्या “सवेसर्वा’ मंडळींना विचारलं तर ते बोर्डासमोर विषय ठेवावा लागेल, त्यांनी मंजुरी दिली तरच तुम्हाला सभासदत्व मिळेल, असे सांगितले जाते. मला त्यांना सभासद म्हणून घ्यायचेच नाही.
आमच्या जागा देऊनही आम्हाला सन्मानान संस्थेत सभासदत्व दिलं जात नाही.’ कर्मवीर आण्णांच्या दृष्टीने पाहिलं तर ही संस्था समस्त रयतेची आहे. ना कुठल्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची आहे. ही संस्था एका कुटुंबाच्या हातात गेली आहे. त्यांना वाटेल त्यालाच संस्थेवर सभासदत्व दिले जाते.
कर्मवीरांनी विकेंद्रीकरणाचा विचार त्या काळात मांडला. मात्र, सध्या शिक्षण संस्थेत देखील सत्तेचं केंद्रीकरण झालं आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या धर्तीवर सध्या कामकाज सुरु आहे, त्यामुळे संस्थेमधील लोकशाही संपुष्टात आलेली आहे, अशी टीका त्यांनी केली..
… तर सातारकरांनी टोल भरू नये
जिल्ह्यातील एमएच 11 व एमएच 50 या क्रमांकांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी मी लेखी स्वरुपात केली आहे. हा टोल कोणाचा आहे, याचे मला देणे घेणे नाही. जिल्ह्यातील जनतेला टोलमाफी झालीच पाहिजे.
टोलनाका व्यवस्थापनाला दहा दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत निर्णय झाला नाही तर सातारकरांनी कोठेही टोल भरू नका, असे आवाहन आम्ही करणार असल्याचे उदयनराजे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.