पारनेर (प्रतिनिधी) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( anna hajare supports farmer strike ) यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आज राळेगणसिद्धी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. तसेच केंद्र सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर मी आयुष्यातलं शेवटचं आंदोलन दिल्लीत करने, असा इशाराही दिली.
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आज सकाळी अण्णांनी ग्रामदैवत संत यादवबाबांचे व पद्मावती देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. ( anna hajare supports farmer strike )
केंद्र सरकारने यापूर्वीही मला दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत, तर माझ्या आयुष्यातील शेवटचे आंदोलन दिल्लीमध्ये करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे. ( anna hajare supports farmer strike )
ते म्हणाले, कृषीमूल्य आयोगाला स्वायत्ता दिली पाहिजे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा हमीभाव दिला पाहिजे. ही मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. मात्र त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी यापूर्वी एकदा दिल्लीत, तर एकदा राळेगणसिद्धीत आंदोलन केले होते. दोन्ही वेळेस केंद्रीय कृषिमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरही स्वामिनाथन आयोगानुसार शेती मालाला हमीभाव व कृषीमूल्य आयोगाला स्वायत्ता मिळालेली नाही, असा आरोप यावेळी अण्णांनी केंद्र सरकार केला.
यावेळी माजी उपसरपंच लाभेष औटी, सुरेश पठारे, दादा पठारे, डॉ. धनंजय पोटे, डॉ. आकाश सोमवंशी, माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, संदीप पठारे, श्याम पठाडे, सुनील हजारे, सुभाष पठारे, महेंद्र गायकवाड, माधव पठारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारनेर तालुक्यात बंदला प्रतिसाद
पारनेर तालुक्यामध्ये दिल्लीतील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा देत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये बंद पाळण्यात आला. पारनेर शहरातही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तालुक्यातील अनेक संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.