नवी दिल्ली – शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शवत मंगळवारी मालवाहतूकदारांनी देशभरात आपली सेवा स्थगित ठेवली. त्यामुळे मालवाहतूकदारांचे सुमारे 2 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मालवाहतूकदार सेवा स्थगित ठेवणार असल्याची माहिती याआधीच ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस या त्यांच्या संघटनेकडून देण्यात आली होती. संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार सुमारे 90 लाख ट्रक, टेम्पो, ट्रेलर भारत बंदच्या दिवशी धावले नाहीत.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मालवाहतूकदारांनी देशभरातील विविध ट्रक टर्मिनल्सवर निदर्शने केली. मालवाहतूकदारांनी बंदला दिलेला पाठिंबा यशस्वी ठरला, असे त्या संघटनेकडून सांगण्यात आले. कृषी क्षेत्र म्हणजे देशाची जीवनरेषा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्या संघटनेने म्हटले.